Thursday 30 April 2015

साद

साद

जसजसा वेळ जाऊ लागला तसतशी ती अस्वस्थ होऊ लागली. सात वाजले होते. काय हा उशीर? बाहेर अंधार
वाढू लागला होता. मनात नाही नाही ते विचार येऊ लागले होते. जीवाची नुसती घालमेल होत होती. गॅलरीतून
आत बाहेर करून करून पायाचे तुकडे पडायची वेळ आली होती. गॅलरीत येऊन तिने पुन्हा एकदा दूरवर रस्त्यावर नजर टाकली. तिसऱ्या मजल्यावरून रस्ता लांबवर दिसतो.
रस्त्यावरचे दिवे पेटले होते. पण अजून पूर्ण अंधार न झाल्याने त्यांचा प्रकाश पडण्यापेक्षा त्रासच होतोय.
रस्त्यावर केव्हढी रहदारी होती? रिक्षा, टॅक्सी, गाड्या, सायकली, स्कूटर्स.. त्यात रस्त्याच्या कडेला बसलेल्या
विक्रेत्यांची गर्दी. संध्याकाळची वेळ, त्यामुळे रस्ता गजबजून गेला होता. ऑफिसातून येणारे लोक, फिरायला
जाणारे लोक, येणारे, जाणारे, भाजी घेणारे, भाजी विकणारे लोक, दुकानाच्या आत लोक, दुकानाच्या बाहेर लोक. कितीही माणस? पण या गर्दीत तिला तिची माणस दिसत नव्हती. भिरभिरत्या डोळ्यांनी ती आपल्या नवऱ्याला आणि सात वर्षाच्या लेकीला शोधत होती.त्यांच्या काळजीने ती व्यथित झाली होती. अजून कसे आले नाहीत? विचार करून करून डोके फुटायची वेळ आली होती. काय करावं तिला काही सुचेना. आजचा दिवसच वाईट. तिला सकाळचा प्रसंग आठवला.
आजचा दिवस रोजच्याप्रमाणेच घाई गडबडीचा उगवला होता. सकाळची काम, सगळ कसं रोजच्यासारख. तिचा आणि तिच्या – नवऱ्याचा- चहा झाल्यावर तिने- जाईला – त्यांच्या लाडक्या लेकीला हाक मारली. पण एका
हाकेला उठली तर ती जाई कसली? नावाप्रमाणेच नाजूक राणी होती तिची जाई. आई-बाबांची लाडकी जाई.
शालिनी आणि शेखरची एकुलती एक लेक. त्यांच्या गळ्यातला ताईत. तिचं हासण, खेळण, रुसण यांनी त्यांच्या आयुष्याला अर्थ दिला होता. लग्नानंतर तब्बल बारा वर्षांनी त्यांच्या संसारवेलीवर आलेलं ते फुल होत. तिच्या बाललीलांनी ते भरून पावत. तिचा प्रत्येक बाळहट्ट पुरवताना त्यांना स्वर्गीय आनंद होई.
रोजच्याप्रमाणेच आजही तिने जाईला पुन: पुन: हाका मारल्या. पण आज जाईने जरा जास्तच आळस केला.
उठेचना. कधीही शाळा न बुडवणारी जाई आज शाळेला जात नाही म्हणू लागली. हे म्हणजे अतीच झालं. अति
लाड झालेत. बास झाले लाड, मुकाट्याने उठ आणि शाळेत जा. शालिनी खरोखरच रागावली होती पण तिच्या या रागाला लेक बधली नाही. तिने बाबांकडे मोर्चा वळवला. झालं आता मात्र शालिनीचा पारा चढला आणि तिने
जाईच्या पाठीत एक धपाटा घातला. आयुष्यात पहिल्यांदाच तिने जाईवर हात उगारला. आणि दुसऱ्याच क्षणी
या करता स्वत:वर किती वैतागली होती ती. पण व्हायचं ते होऊन गेलं होत. आता मात्र जाईने असा काही आवाज काढला कि शालीनिनेही शरणागती पत्करली. खर तर शेखरचा विरोध असूनही शालिनीने जाईला सकाळच्या शाळेत घातले होते. कारण काय, तर जाईला सकाळी लवकर उठायची सवय लागावी. पण त्यामुळे रोजच सकाळी हे नाटक चाले. आधी उठा उठा, मग कसे तरी एकदाचे दात घासा, कसं तरी दुध-बिस्किट घशाखाली ढकला आणि एकदाची शाळेची बसं पकडली कि हुश्य होई. मग घरातील कामात शालिनीचा दिवस भरकन संपे. दुपारी जाई येईपर्यंत सुन सुन वाटणारं घर जाई आलीकी कि तिच्या चिवचिवाटाने भरून जाई. आज मात्र रडारडीला उतच आला. आईच्या हातून दुधही प्यायली नाही. सगळ काही बाबांकडून करून घेतलं. दुपारी शाळेतून आणायला बाबाच पाहिजे. पुन: लॉरेल-हार्डीचा पिक्चरपण बघायचा असं सगळ शिस्तीत कबूल करून घेतलं तेव्हाच बाईसाहेब शाळेत गेल्या. पुन: या कार्यक्रमाला आईला न्यायचं नाही..तिला टुकटुक. तेव्हा कुठे कळी खुलली राणी सरकारांची. दुपारी ठरल्याप्रमाणे शेखरचा फोन आला होता. शाळेतून जाईला घेऊन परस्पर सिनेमाला नेणार होता. पाच वाजतील म्हणाला घरी यायला. मग आता तर सात वाजले.. इतका वेळ कुठे राहिले? अजुन कसे आले नाहीत?
कितीतरी वेळ ती तशीच गॅलरीत उभी होती. शाळेतून परस्पर सिनेमाला गेलेत.. काय खाल्ल असेल? तिला काय म्हणा ते डोसा, सामोसा वगैरे आवडत तसलच काहीतरी खाल्ल असेल. पण त्याला किती वेळ झाला...शेखरला कळत नाही का? आता माझी छकुली येईल आणि आल्या आल्या भूक भूक करेल. हे विचार मनात येताच शालिनी लगबगीने आत आली. सहजच तिने भिंतीवरच्या घड्याळाकडे पहिले. बापरे नऊ वाजले! इतकी रागावलीस का ग आईवर? असा अंत पाहू नका हो माझा शेखर. साधा एक फोन तरी करायचा. माल काळजी वाटत असेल हे कळत कसं नाही तुम्हाला? आता येऊन वर माझीच टिंगल कराल. नाही नाही ते विचार येतायत हो माझ्या मनात.
रिकाम्या पोटी अखेर व्हायचे तेच झालं. क्षणात सर्व काही फिरतय असं तिला वाटलं. तोल जाऊन पडता पडता
तिने एक किंकाळी मारली आणि तिची शुद्ध हरपली.
मिटलेल्या डोळ्यांपलीकडे शालिनीला चाहूल लागली.  कुणाचे आवाज येतायत? ....कुठून येतायत हे आवाज?
....बाहेरून? नाही इथूनच, अगदी जवळून, कोण बोलत य ? कुणी तरी तिला हाका मारीत होते... कोण ते?
शालिनीने हळू हळू डोळे उघडले. तिच्या पलंगाभोवती बरीच मंडळी जमली होती.एक बाई विचारत होत्या
...काकू आता कसं वाटतय? (म्हणजे हे स्वप्न होत? ...माझी जाई? ...शेखर? ..आले का?) अहो उठू नका. झोपून
रहा बर. अशा कशा हो पडलात? काय हो सिस्टर तुमच लक्ष कुठे असत? अहो वय झालंय आता त्यांच. एखाद हाड बीड मोडलं असत म्हणजे? (वय?... माझं? अहो काय बोलताय?) पण त्या बाई काहीच ऐकत नव्हत्या. त्या
सिस्टरशी बोलत होत्या. आणि ते गॅलरीचं दार कुणी उघड टाकलं? बंद करा आधी ते. या काकूंना नादच आहे
गॅलरीत जायचा. उगीच तोल बील जायचा आणि नसती आफत यायची. (कोण काकू? मी? कोणाची बर काकू?)
बर का काकू पुन: ते दार उघडू नका. छान रखिडकीतून बघा हं बाहेरची गम्मत. सिस्टर मला आता कोणतीही
रिस्क घ्यायची नाही. या महिन्यात या दुसऱ्यांदा पडल्या. असं करूया... सरळ कुलूपच लावूया का? तुम्ही सरळ
कुलूप लावून टाका त्या दाराला. म्हणजे मग कटकट नको. कुठे कुठे म्हणून लक्ष ठेवणार? आणि सिस्टरनी
गॅलरीच्या दाराला कुलूप लावून टाकलं. शालिनीला खूप खूप वाईट वाटलं. ओरडून सांगावसं खूप वाटत होत. नका हो कुलूप घालू त्या दाराला .. माझी जाई, माझा शेखर आले नाहीत अजून. आत्ता येतील ते. डोळ्यात अश्रू घेऊन ती हताशपणे बघत राहिली. सर्व काही अस्पष्ट होऊ लागलं. तिने डोळे मिटून घेतले. हे सर्व काय चाललय? आपण नेमक्या कुठे आहोत? ह्या बायका कोण तिला काहीच कळेना. आपल्याला असं कोंडून का बऱ ठेवलय? पलीकडच्या खोलीत बायका दबक्या आवाजात काहीतरी बोलत होत्या. कुणाबद्दल बोलतायत त्या? आपल्याच बद्दल कि काय? ती लक्ष देऊन त्याचं बोलण ऐकू लागली. एक जण विचारत होती.. कोण हो या बाई? आणि इथे कशा? चांगल्या घरच्या दिसतात. कोणी तरी सांगू लागली.. चांगल्या घरच्या म्हणजे काय? चांगल्या खात्यापित्या घरच्या कि हो. नवरा, एक मुलगी सात वर्षाची, असा सुखी संसार. पण बाई आज इथे एकट्या आहेत. पण म्हणजे झालं तरी काय? पुन: पहिलीने  विचारलं. काय सांगू? सुमारे २५ वर्षापूर्वीची ही गोष्ट असेल. या बाईंची मुलगी आणि नवरा कुठे बाहेर गेले होते म्हणे. या बाई अशाच गॅलरीत उभ्या राहून त्यांची वाट बघत होत्या. मग.. ? पहिलीने पुन: विचारलं. अहो मग काय? खूप उशिराने घरी आला तो एकता त्यांचा नवरा. आणि मुलीचं काय?
अहो ऐका तरी. मुलीचा म्हणे अपघात झाला होता. हात सोडून एकाएकी धावली आणि गाडीखाली आली.
अयाई ग ..इति पहिली. अहो एव्हढंच नाही तर मुलगी गेल्याचं कळल्यावर यांनी केलेला आक्रोश पाहून यांच्या
नवऱ्याने गॅलरीतून उडी मारून जीव दिला म्हणे. अरेरे काय बाई तरी एकेकाचं नशीब असत नाही? दोघी तिघी
हळहळल्या. हे ऐकलं आणि शालिनी अवाक झाली. हे मी काय ऐकते आहे? खरय का हे? तिला प्रश्न पडला. तिने ताडकन डोळे उघडले. आजूबाजूला पाहिलं. खरच हे काही माझं घर नाही. त्या छोटयाशा खोलीत जुजबी सामान
होत. एखाद्या हॉस्पीटल मधली ती खोली असावी. खोलीत एक पलंग, एक टेबल-खुर्ची आणि एक आरसा पण
होता. मोठ्या प्रयासाने शालिनी पलंगावरून खाली उतरली आणि हळूहळू आरशाजवळ गेली. आरशातील व्यक्ती तिच्या ओळखीची नव्हती. कुणी तरी वयस्क म्हातारी आरशातून तिच्याकडे बघत होती. कोण होती ती म्हातारी? केसांत चंदेरी झाक, डोळ्याभोवती काळी वर्तुळ, लोंबलेली निस्तेज कातडी असलेली ही बाई शालिनी कशी असेल? शालिनी तर चाळीशी ओलांडूनही कशी रसरशीत होती. काळेभोर लांब सडक केस, केतकी वर्ण, सतेज कांति, पाणीदार बदामी डोळे..छे छे ही शालिनी असूच शकत नाही. पण मग आरशात दिसणारी ती जर शालिनी नाही तर मग मी आहे तरी कोण? पण.. त्या बाई म्हणतात ते जर खर असेल तर ते रूप कुठे हरवलं? खरच का मी इतकी म्हातारी झाले आहे? हो नक्कीच तरीच त्या मला काकू म्हणत होत्या. याचा अर्थ मध्ये इतकी वर्ष गेली आपल्याला कळलेच नाही? काही न सुचून शालिनी पलंगावर जाऊन बसली. गेलेल्या काळाचे आश्चर्य करत राहिली.
असं कसं झालं? या प्रश्नाचे उत्तर शोधू लागली. शेखर आणि जाईच्या आठवणीत. आता फक्त आठवणीच होत्या. ते आता कधीच परत येणार नव्हते. तिला गहिवरून आले. डोळे पुन: भरून आले. तिने डोळे गच्च मिटून घेतले. डोळे मिटूनही भरून येतच राहिले. मिटलेल्या डोळ्यांनी ती पुन: एकदा नव्याने गत काळातील तो दिवस पाहू लागली.
तो काळा कुट्ट दिवस. पाच वाजेपर्यंत येणारी ती दोघ साडेसात वाजले तरी आली नव्हती. तिने आठवेल त्या
सर्वांकडे फोन केले. नातेवाईक, मित्र, कोणी कोणी सोडले नाही. वेड्यासारखी ती ज्याला त्याला त्या दोघांबद्दल
विचारत सुटली. कुणाकडून काही पत्ता लागत नव्हता. वेळ जात होता. साडेनऊ वाजलेले तिने पहिले आणि
इतक्यात दारावरची बेल वाजली. तिने धावतच जाऊन दार उघडलं.दारात बरीच लोकं होती. शेजारी आणि काही अनोळखी लोकं सुद्धा होती. आणि पोलीस? तिने ओरडूनच विचारलं जा माझ्या नवऱ्याला आणि मुलीला आधी शोधा जा. त्या पोलिसांच्या मागोमाग शेखर घरात आला. ती त्याच्या मागे जाईला शोधात राहिली. जाई? कुणी तरी पाठीवर हात ठेवला. काय नव्हत त्या स्पर्शात? दया , सहानुभूती, कीव .. ती एकदम लांब सरकली. हे काय चालवलंय तुम्ही? शेखर शेखर अहो जाई कुठय? शेखरने तिला जवळ घेतलं...आणि गदगदलेल्या स्वरात म्हणाला आपली जाई…  आपली जाई  आपल्याला सोडून गेली ग.
काय काय म्हणताय तुम्ही? शुध्दीवर आहात का? अशी कशी जाईल ती आपल्याला सोडून? अग खरच वाटत
नाहीये ग मला सुद्धा. दिवसभर किती मजेत होती ती. ठरल्याप्रमाणे मी तिच्या शाळेत गेलो... तुला फोन केला
होता ना मी? ती वाटच बघत होती. शाळेतून हॉटेलात गेलो. तिच्या आवडीचं सगळ खाल्ल प्यायलं. मग
सिनेमाला गेलो. हो हो मी तिकीट आधीच काढली होती. सिनेमा संपल्यावर मात्र तिला तुझी आठवण यायला
लागली.मग घरी यायची अगदी घाई झाली होती ग तिला. आम्ही टॅक्सी थांबवली. टॅक्सीत बसायला ती इतकी उतावीळ झाली कि माझा हात सोडून रस्त्यावर धावत सुटली. आणि मला काही समजायच्या आत पलीकडून येणाऱ्या गाडी खाली.... शेखरला पुढे बोलवेना आणि तिला ते ऐकवेना. तिने कानावर हात ठेवले. खोट खोट साफ खोट आहे हे. नाही ग मी खोट कशाला बोलू.  कुणीतरी तिला ओढून स्टे्चर जवळ आणल. चादर बाजूला केली. जाई? अग आई ग हे काय झालं? आई ग .. तिच्या त्या किंकाळीने सगळ्यांची मन हेलावली. जाई ... आकांत करणाऱ्या तिचं सांत्वन कसं होणार होत? जाईने खरच तिला टुकटुक  केलं होत. आईवर इतकं रागावत का कुणी? तिच्या प्रश्नांची उत्तरं कुणाकडेही नव्हती. रडता रडता तिने शेखरला विचारलं. पण मग इतका वेळ? मला फोन का नाही केला? अग हे सगळ घडलं आणि प्रथम तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. मग पोलीस, पंचनामा आणि डॉक्टरांनी हात टेकल्यावर काय फोन करणार होतो मी तुला? आपली जाई गेली हे मी तुला फोनवर कसं बर सांगणार होतो? मला माफ कर शालू मी आपल्या जाईला सांभाळू शकलो नाही ग . मला माफ कर. एव्हढ ऐकलं आणि शालिनी एखाद्या वाघीणी सारखी चवताळून उठली. ती शेखरवर हातांनी वार करू लागली. माझी जाई मला परत आणून द्या. तिच्यशिवाय घरी आलातच कसे? तुम्हीच मारलंत माझ्या जाईला. तिच्या या आकस्मीत प्रतिक्रियेने लोकं अवाक झाली. शालिनीने त्याला ढकलत ढकलत गॅलरीत नेलं होत. तिच्या या हल्ल्याला शेखर परतविण्याचा प्रयत्न करत होता. शालिनी रडत होती आणि झोंबाझोंबीही करत होती. शेखर तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता.आणि अचानक शेखर गॅलरीतून खाली कोसळला. शेखर ऽऽऽऽऽ लोक
म्हणतात तुम्ही आत्महत्या केली. आत्महत्या? पण का? नाही नाही ते आत्महत्या करण शक्य नाही. मी ... हो मीच कारणीभूत आहे या सर्वाला. त्याचीच शिक्षा आहे ही. पण आणखी किती शिक्षा भोगायची आहे? मला एकटीला सोडून जाताना काहीच कसं वाटलं नाही तुम्हाला? किती प्रेम आहे माझं तुम्हा दोघांवर. माहित आहे ना? तुम्ही दोघही गेलात ना मला एकटीला टाकून... मी कधीची वाट पाहते आहे तुमची. आणखी किती सतावणार आहात मला? हा खेळ थांबवा हो आता....परत या परत या.….
आज त्या गोष्टीला किती वर्ष झाली कुणास ठाऊक २५?..३०? पण आजही तो दिवस तिच्या स्मृतीत अगदी काल घडल्या प्रमाणे जसाच्या तसा कोरला गेला आहे. आजही ती वाट पाहते आहे शेखरची, जाईची. तिच्यासाठी जणू काळ पुढे सरकलाच नाही. तिच्याप्रमाणे त्यालाही (काळ) प्रतीक्षा आहे त्या दोघांची. तिच्या बरोबर जणू तोही शेखर व जाईला साद घालतो आहे.

अल्पना लेले  (वर्ष २००८).

No comments:

Post a Comment